आजनंतर

आणू नको कधीही तसले मनात काही
आहे, तुझाच आहे, सध्या जगात नाही
ताब्यात जन्म नाही, ताब्यात अंत नाही
संपायची कधी ही एकाधिकारशाही?
माझ्या मनात येते की मी तुला म्हणावे
"संबंध काय आहे माझा तुझा तसाही?"
प्रत्येक दु:ख माझे जेव्हा बनेल शाई
होतील शब्द सारे साधेसुधे, प्रवाही
देवा नवीन दे वा मन हे दुरुस्त कर तू
जो भेटतो मला, हे, त्याचाच भार वाही
ते लाभता हवेसे, होते नकोनकोसे
आहे कुणाकुणाचा हा थाट बादशाही?
जा तू खुशाल वेडे, सबबी नकोत आता
होतोच ना असाही? राहीन मी कसाही!
’हातात येत नाही, वाटेत येत नाही”
माझी दिशा नसावी तुमच्या दिशांत दाही
नाही कधीच झाले ते आज होत आहे
नक्कीच आजनंतर येणार श्वास नाही
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
सही गझल!
प्रत्येक दु:ख माझे जेव्हा बनेल शाई
होतील शब्द सारे साधेसुधे, प्रवाही
वा! क्या बात है! सगळेच शेर खास, पण हा अगदी अंतरातला!
क्रान्ति
केवळ अप्रतिम !
कुठला शेर आवडला म्हणू?
सारेच अप्रतिम आहेत. केवळ अप्रतिम !!
वैभवची एक कल्पना
होतोच ना असाही राहीन मी कसाही - या ओळीत वैभवने केवळ एका अक्षराचा बदल सुचवला, पण उत्तम बदल व स्वीकारण्यालायक बदल!
होतोच ना असाही च्या ऐवजी होतोच ना तसाही - कारण तसाही हा शब्द जास्त मराठी शैलीचा असून 'असाही' हा 'ऐसेभी' या हिंदी शैलीचा आहे. तसाहीमधे छटा आहे जी असाही मधे येत नाही. असाही जास्त आक्रमकही वाटतो. मी जरी वरील गझलेत तो बदल करत नसलो ( कारणे वैयक्तिक आहेत ) तरीही हा बदल निश्चीतच चांगला आहे. वैभवचे धन्यवाद!
मुकुंदराव व क्रान्ति आपल्या दोघांसाठी -
बहुतेकांना दु:ख शाई होण्याचा शेर आवडला. परंतू या गझलेतील माझ्यामते सर्वात चांगला ( हेही वैयक्तिकच मत, गझलच काही विशेष नाही असेही माझे मत आहे व ते काहींना पटेलही. ) शेर आहे: ( खरे तर एक ओळच चांगली आहे. )
जा तू खुशाल वेडे, सबबी नकोत आता
होतोच ना अ ( त ) साही, राहीन मी कसाही
यात, प्रेयसी कायमची दूर जाण्याचे दु:ख कवीला वाटत असतानाच ती त्याला सांगायला आली आहे की तिची त्याला सोडून जाण्याची काय काय कारणे आहेत. पण मुळात ती तिथेच असतानाच ती कवीकडे इतके दुर्लक्ष करायची की कवीला ती आहे काय अन नाही काय एकच झाले होते. म्हणून त्याला आता असे वाटत आहे की त्या सबबी ऐकून काय मोठा फरक पडणार आहे? त्याची परिस्थिती तीच राहणार!
याच गजलेत मला आवडलेला आणखी एक शेर :
ते लाभता हवेसे, होते नकोनकोसे
आहे कुणाकुणाचा हा थाट बादशाही?
एखाद्या राजपुत्राला जसे नवनवीन खेळणे आणल्याआणल्याच लगेच नकोसे होते ( कारण तो राजपुत्र असल्यामुळे त्याची कुठलीही इच्छा सहज पुर्ण होत असल्यामुळे त्याला त्याची काही किंमतच नसते व लगेच दुसरा हट्ट सुरू होतो ) तसे, मला एखादी गोष्ट मिळायलाच इतका वेळ लागतो की तोपर्यंत त्यातील रसच निघून जातो व ते मिळते तेव्हा नकोसे झालेले असते. अर्थात, हा शेर काही फार ग्रेट नाही किंवा मी दिलेला अर्थ त्यातून नीट प्रकटही होत नसेल हे मला मान्य आहे. पण मला तसे म्हणायचे होते हे सांगण्यासाठी हा खुलासा!
मी स्वत:च्या रचनांवर इतके बोलत नाही, पण आपण दोघांनी प्रतिसाद दिलात व तोही एका तौलनिक द्रुष्ट्या सपाट शेराला दिलात म्हणून मुद्दाम दोन वेगळ्या शेरांचे अर्थ दिले ज्याने आपल्याला त्या शेरांतील द्रुष्टिकोन लक्षात आल्यास एकंदरच उपयुक्त ठरेल अशी गर्विष्ठ भावना होती.
प्रतिसादाबद्दल आपले व आपुलकीने दुरध्वनीवर संवाद साधण्याबद्दल वैभवचे मनापासून आभार!
माझ्या
माझ्या मनात येते की मी तुला म्हणावे
"संबंध काय आहे माझा तुझा तसाही?"
प्रत्येक दु:ख माझे जेव्हा बनेल शाई
होतील शब्द सारे साधेसुधे, प्रवाही
’हातात येत नाही, वाटेत येत नाही”
माझी दिशा नसावी तुमच्या दिशांत दाही
खल्लास..... अप्रतिम...
थेट थेट भिडले...
तडजोड
नाही कधीच झाले ते आज होत आहे
नक्कीच आजनंतर येणार श्वास नाही
अर्थ लागत नाही.. (5 वा शेर जोडण्यासाठी केलेली ही तडजोड तर नाही )
संख्या
मी शेर मोजले भावलेकर! एकंदर 9 शेर दिसतायत. मधले चार शेर वाचायचे राहिले तर नाहीत? हा हा हा!
असो. आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. अर्थ लागत नाही यासाठी दिलगिरी!
एकंदर आयुष्यात माणसाला जे विविध त्रास / मनस्ताप वगैरे होतात त्या प्रत्येक वेळी काही ना काही उपाय / औषधे / वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याने सगळेच त्रास आपल्या ताब्यात आहेत असा काहीतर गैरसमज झालेला असतो. पण शेवटचा जो त्रास होतो तेव्हा त्याच्यावर काहीही उपाय नाही हे जेव्हा लक्षात येते तेव्हा एक भयंकर दु:ख मनाला व्यापते. हा झाला शब्दार्थ!
शब्दार्थापलीकडील अर्थ ! काहीतरी विशिष्ट चांगले घडावे या प्रयत्नात माणूस असतो. जसे, वैभव लाभणे, प्रेम लाभणे वगैरे! याच प्रयत्नात असल्यामुळे त्याच्यात जगण्याची उर्मी टिकून असते. पण तेच झाले नाही किंवा होणार नाही हे लक्षात आल्यावर तो खचतो व ती उर्मी संपते. ( विशेषत कर्जबाजारी वगैरे लोकांच्या बाबतीत असे झालेले मीही पाहिले आहे. )
मुद्दा -
1. याच्यात हे सगळे कुठे म्हंटले गेले आहे असा जर प्रश्न असेल तर आपले म्हणणे खरे आहे. तसे स्पष्ट म्हंटले न जाण्यासाठीही मी दिलगीर आहे.
2. यात सच्चेपणा काय असा जर प्रश्न असेल तर त्याहीबाबत मी दिलगीर आहेच कारण मी परदु:खांच्या कल्पना करून 'गझला' रचतो हे यापुर्वीही सिद्ध झालेले आहे.
तेव्हा आपला रसभंग झाला यासाठी माफ करावेत.
धन्यवाद!